Skip to content

आपणच सोडवू आपले प्रश्न स्वाध्याय इयत्ता 5 वी

  • by
आपणच सोडवू आपले प्रश्न स्वाध्याय इयत्ता पाचवी

आपणच सोडवू आपले प्रश्न हा इयत्ता पाचवीच्या परिसर अभ्यास भाग एक पाठ्यपुस्तकातील सातवा घटक आहे. या घटकांमध्ये गावांमध्ये अथवा शहरांमध्ये निर्माण होणाऱ्या सार्वजनिक समस्या, निर्माण होणारे तंटे आणि त्यांचे निवारण, हिवरे बाजार या अहमदनगर जिल्ह्यातील गावात निर्माण केलेल्या सोयी आणि श्रमदानातून ग्रामसफाई याबाबतची माहिती दिली आहे. श्रमदानातून ग्रामसफाई यामध्ये संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे.

आपणच सोडवू आपले प्रश्न स्वाध्याय

१) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

  1. समस्यांकडे डोळे झाक केल्यावर त्या अधिक तीव्र बनतात.
  2. परिसरातील समस्या ओळखणे ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे.

प्रश्न २) पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

  1. सार्वजनिक समस्या म्हणजे काय?

आपल्या गावातील किंवा शहरातील लोकांना ज्या अडचणी येतात किंवा जे प्रश्न भेडसवतात त्यांना सार्वजनिक समस्या म्हणतात. कारण या समस्या संपूर्ण गावातील लोकांना येत असतात.

2. सार्वजनिक समस्या कशा सुटू शकतात?

सार्वजनिक समस्या या गावातील अथवा शहरातील अनेक व्यक्तींच्या समस्या असतात. त्यामुळे सार्वजनिक समस्या एकटी व्यक्ती सोडवू शकत नाही. त्या सर्वांच्या प्रयत्नाने आणि सर्वांच्या सहभागातून सुटू शकतात.

3. स्वच्छतेचे महत्व कोणत्या संतांनी पटवून दिले?

स्वच्छतेचे महत्व संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी पटवून दिले.

प्रश्न ३) आपणच सोडवू आपले प्रश्न घटकाच्या आधारे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

अ. ‘श्रमदानातून ग्राम सफाई’ ही संकल्पना स्पष्ट करा.

ग्रामसफाई ही संपूर्ण गावाची जबाबदारी असते. एकटा व्यक्ती संपूर्ण गाव साफ करू शकत नाही. गावाची स्वच्छता गावातील सर्वांनी मिळून करायची असते. त्यासाठी गावातील सर्व लोकांनी एकत्र येऊन परस्परांच्या विचाराने आणि सहकार्याने गावाच्या स्वच्छता बाबत नियोजन करणे आवश्यक आहे. गावातील प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीने ग्रामसफाई मध्ये सहभागी होऊन संपूर्ण गावाची सफाई श्रमदानातून करता येते. ग्रामसफाई मध्ये गावातील सांडपाण्याचे नियोजन करणे, उकिरड्यावरील कचऱ्याचा वापर करून गांडूळ खत तयार करणे, स्वच्छतागृह बांधणे व त्याचा वापर करणे याबाबत काम करता येईल.

आ. शांततेला पूरक वातावरण कसे निर्माण करता येईल?

शांततेसाठी समाजातील सर्व घटकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता होणे आवश्यक आहे. प्रत्येकास आवश्यक ती सुरक्षितता मिळाली पाहिजे. समाजातील शोषण थांबले पाहिजे. विषमता कमी झाली पाहिजे. शांततेचे महत्व समजावून घेणे, शांततेचे मार्ग प्रत्यक्षात वापरणे या मार्गाने आपण कुटुंबात, शाळेत आणि सार्वजनिक जीवनात शांततेला पूरक वातावरण निर्माण करू शकतो.

नवोदय विद्यालय परीक्षा 2025 संपूर्ण माहिती

प्रश्न ४) आपणच सोडवू आपले प्रश्न घटकाच्या आधारे पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल ते सांगा.

अ. वर्ग प्रमुखाला वर्गात शांतता निर्माण करायची आहे.

  1. सर्व विद्यार्थ्यांना योग्य स्वाध्याय देऊन त्यामध्ये गुंतवून ठेवणे.
  2. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे अभ्यासाला पूरक कृती करण्याची संधी देणे.
  3. वर्गातील शांततेचे महत्व पटवून देणे.
  4. वर्गाने शांततेबाबत स्वतः नियम करणे.
  5. वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याला आपले म्हणणे मांडण्याची संधी देणे.

इत्यादी मार्गाने वर्ग प्रमुखाला शांतता निर्माण करता येईल.

आ. गणित विषयाचे शिक्षक काही अपरिहार्य कारणास्तव आज वर्गात येऊ शकत नाहीत.

  1. अगोदर शिकवलेल्या घटकातील उदाहरणांचा सराव करेन.
  2. गणितातील क्लुप्त्या, सूत्रे लिहून पाठ करेन.
  3. कठीण वाटणारी उदाहरणे वर्गातील हुशार मुलाच्या मदतीने सोडवण्याचा प्रयत्न करेन.
  4. गटप्रमुखाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे.

इ) क्रीडांगणावर खेळाच्या सामन्याच्या वेळी दोन संघांमध्ये वाद निर्माण झाला आहे.

  1. वादाबाबत निपक्षपातीपणे शिक्षकांना माहिती देईन.
  2. वाद घालणाऱ्या मित्रांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन.
  3. मैदानावरील वाद मैदानावरील खेळा पुरते मर्यादित ठेवेन.

शिष्यवृत्ती परीक्षा सराव app

आपणच सोडवू आपले प्रश्न या घटका वरील स्वाध्याय प्रश्न व उत्तरे या ठिकाणी देण्यात आली आहेत. या पाठाबाबत आणखी काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *